बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

डीएसकेंच्या गुंतवणूकदारांचे आता काय होणार ?

’मराठी माणूस मेहनत घेणारा, चिकाटी असलेला आणि म्हणूनच विश्वासूही आहे. सरळमार्गी मराठी माणसावर लोक विश्वास ठेवतात आणि जगभरातून त्याच्याबरोबर उद्योगधंदा करायला लोकांना पूर्वापार आवडते’.असे डीएसके म्हणायचे आणि लोकही त्यांच्या या वाक्यावर टाळ्या वाजवायचे.


परंतु त्यांचे प्रत्यक्ष वर्तन मात्र वगळेच होते. ग़ुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार होते.


धक धक गर्ल माधुरी दिक्षीत ही म्हणे एकेकाळी डी.एस.कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर होती. किमान या कंपनीच्या १९९७ -९८ च्या अहवालात तसा उल्लेख आहे. 

शासकीय कागदपत्रांध्ये मात्र माधुरी डायरेक्टर असल्याचा उल्लेख आढळून येत नाही . कदाचित गुंतवणुकरांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी ती पुडी सोडली असावी.


परंतु याच त्यांच्या ’पुडी सोडण्याच्या ’ उद्योगामूळे त्यांची वाताहात झाली.

एकेकाळी मराठी माणसाला व्यवसाय यशस्वी कसा करायचा यावर सल्ला देणारे डिएसके आपली  देणी फेडण्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन करू लागले  आहेत. हे आवाहन सध्या समाज माध्यमामध्ये चर्चेचा विषय झाले आहे.



हे आवाहन नेमके कुणी केले माहित नाही.परंतु ज्याअर्थी त्यात डीएसकेच्या बॅक़ खात्याचा उल्लेख आहे त्याअर्थी या आवाहनाला त्यांची संमती आहे हे नक्की !

या आवाहनात त्यांनी मराठीपेक्षा आपल्या ब्राम्हण असण्यावर जास्त भर दिलेला दिसतो.

आपली जेवढी देणी आहेत त्याच्या दहापट जास्त आपली संपत्ती आहे असे ठणकावून सांगणा-या डीएसकेंवर लोकवर्गणी मागण्याची वेळ का आली  असावी?

डीएसके स्वत: आणि इतर बरेचजण त्यांच्या अवस्थेचा दोष नोटबंदी, त्यांचा अपघात आणि त्यांचा अतीमहत्वाकांक्षी प्रकल्प ‘ डीएसके ड्रीम सीटी’ या प्रकल्पाला देतात .

परंतू ते धादांत चूकीचे आहे!

डीसकेंवर ही वेळ आली ती त्यांनी त्यांच्या मूख्य व्यवसायातील पैसा कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर बेकायदा वळवल्यामूळे, त्यांच्या कुटूंबाच्या विलासी वागणुकीमुळे आणि चुकीच्या निर्णयांमुळे !

पुढे जाण्यापूर्वी काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

मूळ कंपनी डी. एस कुलकर्णी डेवलपर्स लिमिटेड  ( डीएसकेडीएल) ही सेबीकडे नोंदणीकृत पब्लिक लिमिटेड कंपनी आहे.

या कंपनी व्यतिरिक्त डीएसकेच्या कुटुंबातील व्यक्तींनी इतर जवळपास ३० कंपन्या स्थापन केल्या.त्यातील काही कंपन्या या  प्रायव्हेट लिमिटेड किंवा भागीदारी संस्था होत्या. या कंपन्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी नव्हती.
तरीही त्या स्विकारल्या आणि बुडवल्याही !

डीएसकेंच्या कुटुंबातील लोकांनी डीएसकेडीएल या कंपनीचा पैसा कसा ओरबाडला हे ‘डीएसके ड्रीम सीटी’ च्या एका उदाहरणावरून लक्षात येईल.

२००५ -०६ च्या सुमारास डीएसकेडीएलने फुरसुंगी येथे एक विशेष आर्थिक क्षेत्रासाठी (एसईझेड) परवानगी मागीतली. ती त्यांना मिळालीही. त्यासाठी १०० एकरांपेक्षा जास्त जमिनीची गरज होती.

अशी शेतजमिन खरेदी करण्यासाठी लागणारी परवानगीही त्यांना मिळाली.

अशी परवानगी मिळालेली असतानाही या जमिनी डीएसकेडीएलने थेट शेतक-यांकडून खरेदी केल्या नाहीत.

आधी डीएसकेंचे कुटुंबीय किंव त्यांच्या भागीदारी संस्था यांनी शेतक-यांशी करार करायचा, थोडीशी विसार रक्कम द्यायची आणि नंतर डीएसकेडीएलने ती जमीन शेतक-यांकडून खरेदी करायची आणि विसार पावती केली म्हणून कुटुंबीय किंवा त्यांच्या कंपन्याची मान्यता घेतल्याचे दाखवायचे. आणि या मान्यतेची किंमत म्हणून त्यांना मूळ शेतक-यापेक्षा जास्त रक्कम द्यायची. असा हा व्यवहार असायचा.


 
उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतक-याच्या जमिनीचा व्यवहार ५० लाख रुपयांना ठरला असेल तर डीएसकेडीएल ती जमिन थेट शेतक-यांकडून घेत नसे. डीएसकेंचे कुटुंबिय किंवा त्यांची भागीदारी संस्था आधी त्या जमिनीबाबत ५ लाख रुपये देउन विसार पावती करत असत आणि नंतर ५-६ महिन्यांनी डीएसकेडीएल त्या शेतक-याशी व्यवहार करून उरलेले ४५ लाख रुपये शेतक-याला देत असे आणि विसार पावती केली असल्याने कुटुंबियांची किंवा त्यांच्या संस्थेची मान्यता घेतल्याचे दाखवून त्या मान्यतेची किंमत म्हणून त्यांना ७५ लाख रुपये देत असे.

अशा रितीने केवळ मान्यतेपोटी डीएसकेडीएलने कुटुंबिय किंवा त्याच्या संस्थाच्या घशात १५० ते १७५ कोटी रुपये घातले. एकट्या ड्रीम सीटी प्रकल्पात एवढी रक्कम पळवली असेल तर इतर सर्व प्रकल्प लक्षात घेता किती रक्कम अशा रितीने पळवली असेल याचा विचार करा.

याशिवाय या एसईझेडला सर्व कर माफ असल्याने दस्तासाठी द्यावी लागणारी स्टॅम्प ड्युटीदेखील माफ होती. त्यामूळे सुमारे ३.५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली.

नंतर एसईझेड प्रकल्पाऐवजी टाउनशिप करण्यात आली. परंतू स्टॅम्प ड्युटीचे काय ?




डीएसकेंच्या विद्यमान पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी अधिकृतरित्या वर्ष १९८९ मध्ये आपले नांव बदलले. असे असतानाही त्या अगदी २०१२ पर्यंत त्यांचे आधीचे नांव हेमते फडके आणि हेमंती कुलकर्णी दोन्ही नावांनी वावरत होत्या.

इतकेच नव्हे तर त्यांनी एकाच वेळी दोन्ही नांवांनी शेअर्स खरेदी केल्याचेही दिसते




हे कमी म्हणून की काय डीएसकेंच्या दुस-या पत्नी ज्योती २०१२ मध्ये कालवश झाल्यांनंतर हेमंती कुलकर्णींचा मुलगा ज्योतींचा मुलगा म्हणून  अधिकृतरित्या दाखवण्यात आले.




परंतु शिरिष कुलकर्णीच्या पासपोर्टवर मात्र ते हेमंती कुलकर्णींचा मुलगा असल्याचे म्हटले आहे.


त्यांनी असे का केले याचे उत्तर डीएसकेंनी ठेविदारांना दिले पाहिजे.

एरवी डीएसकेंच्या कौटुंबिक बाबींमध्ये इतरांनी लक्ष घातले नसते. परंतु इथे प्रश्न गुंतवणुकदारांच्या पैशांचा आहे. आणि डीएसकेंनी गुंतवणूकदारांचा पैसा कुटुंबियांकडे वळवला आहे.आपल्या पैशांच्या बाबतीत काय घडले हे जाणून घेण्याचा हक्क गुंतवणूकदारांना आहे.

खोट्या सह्या करणे वगैरे बाबींना डीएसकेडीएलमध्ये फारसे गांभीर्याने घेत नसत.




एका शेअर सर्टीफिकेटवर २००१ साली डीएसकेंचे जावई संजय देशपांडे यांची सही आहे. काही वर्षांनी म्हणजे २०१२ साली काही कारणांनी हे सर्टीइकेट रिइश्यू केले तेंव्हाही त्यांचीच सही कुणीतरी केलेली दिसते. महत्वाची बाब म्हणजे संजय देशपांडे यांनी २००४ मध्येच डीएसकेडीएल सोडली होती . संजय देशपांडे यांनी माझ्या इंग्रजी ब्लॉगवर तशी कबुलीही दिली आहे. मग २०१२ मध्ये संजय देशपांडे यांची सही केली कुणी?



विशेष म्हणजे दोन्ही वेळा या सर्टीफिकेटवर डीएसकेची आहे तर २००१ ला हेमंती फडके आणि २०१२ ला हेमंती कुलकर्णी यांच्या सह्या आहेत. हेमंती फडके आणि हेमंती कुलकर्णी या एकच व्यक्ती असल्याने . तीसरी सही कुणी केली हे त्या दोघांना माहिती असले पाहिजे किंवा ती सही या दोघांपैकी एकाने केली असली पाहिजे 

आता सुमारे आठ हजार ठेविदार हवालदिल झाले आहेत.त्यांना मागील अनेक महिने मुद्दल सोडा साधे व्याजदेखील मिळालेले नाही.

आश्चर्य म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये या ठेवी आहेत . त्यांना ठेवी स्विकारण्याची परवानगी रिझर्व बँकेने कधी दिलीच नव्हती.

ज्या कंपन्यांनी या ठेवी स्विकारल्या त्या सर्व भागीदारी संस्था आहेत.त्यामध्ये डी.एस कुलकर्णी अँड कंपनी, डीसके अँड असोसिएट्स, डी.एस कुलकर्णी अँड ब्रदर्स , डीएसके अँड सन्स, डीएसके एंटरपप्रायझेस यांचा समावेश आहे.




मग गुंतवणुकदारांनी अशा कंपन्यांमध्ये ठेवी का ठेवल्या?

कारण साधं आहे.

डीसके हे एखाद्या नटसम्राटालाही लाजवतील असे अभिनेते आहे, त्यांचं वक्तृत्व कौशल्य उत्तम आहेत आणि ते उत्तम इव्हेंट मॅनेजर आहेत.


गुंतवणुकदारांसाठी आणि घर खरेदी करणा-यांसाठीही त्यांनी वेळोवेळी कार्यक्रम आयोजित केले.ते कार्यक्रम डीएसकेडीएलचे होते.


मात्र त्या कार्यक्रमांमूळे आकर्षित झालेल्या गुंतवणुकदारांना बेमालूमपणाने आपल्या कुंटुंबियांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडले.




आता डीएसकेंना मराठी माणूस आणि प्रामुख्याने ब्राम्हणांची आठवण झाली आहे परंतु डीसकेंनी आता पर्यंत किती मराठी माणसांना मदत केली ?

मध्यंतरी ज्यांच्यामूळे डीसकेंच्या व्यवसायाची सुरुवातीच्या काळात भरभराट झाली त्या विनय फडणीसांना अटक झाली. आजही ते तुरुंगात आहेत आणि त्यांची पत्नी फरार आहे.

ते विनय फडणीस मराठी आणि प्रामुख्याने ब्राम्हण होते !

त्यांच्या मदतीसाठी काही करावे असे डीएसकेंना का वाटले नसावे ?. फ़डणिसांचा गुन्हा डीएसकेंच्या गुन्ह्याच्या तुलनेत सौम्य मानावा लागेल.

ज्या मराठी तरुणांना डीएसकेंनी आता साद घातली आहे त्याला देशोधडीला लावायलाही डीएसकेंनी मागेपुढे पाहिलेले नाही.

डीएसकेंच्या ‘आधी घर,पैसे नंतर‘ या योजनेखाली अनेक तरुणांनी घरांसाठी कर्ज घेतले.

योजना अशी होती की घर घेणा-याने आधी १०% रक्कम द्यायची आणि कर्ज काढायचे.परंतु जोपर्यंत घर ताब्यात मिळत नाही तोवर हप्ता डीएसकेंनी भरायचा.

आता डी.एस. कुलकर्णी अँड कंपनीने हप्ता भरला नाही म्हणून वित्त संस्थांनी मूळ कर्जदाराला नोटीसा पाठवायला सुरुवात केली आहे.सात दिवसात पैसे भरा अन्यथा कारवाई करू.




आता या तरुणांची अवस्था घर ताब्यात नाही, आताच्या घराचे भाडे भरावे लागत आहे, बँका वसूलीसाठी मागे लागल्या आहेत आणि हप्ते थकल्याने सिबिल रेटींगही खराब झाले आहे.

आता प्रश्न असाही आहे की जागेवर दहा टक्के कामही झालेले नसताना वित्तिय संस्थांनी एकूण कर्जाच्या ८०% रक्कम डी.एस. कुलकर्णी अँड कंपनीला वितरीत तरी कशी केली?

आश्चर्य म्हणजे काही वित्तिय संस्थांनी गृहकर्जाच्या ८० % रकमेबरोबर त्याच प्रकल्पावर बांधकामासाठी आणखी कर्ज दिल्याचे बोलले जाते. अर्थात वित्तिय कंपन्याच्या संगनमताशिवाय हे झालेले नाही हे नक्की.

मग संगनमताने अशी लूट झाली असेल घर खरेदी करणायांनी त्याचा भुर्दंड का सोसावा?

या वित्तिय संस्था डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियांना सोडून सामान्य ग्राहकांना का छळताहेत?

डीएसकेंनी आता मराठी माणसाला आवाहन केले असले तरी त्यांच्या अलिशान रहाणीमानात मात्र तसूभरही फरक पडलेला नाही.

एकेकाळी  करोडोंच्या गाड्यांच्या ताफ्यातून फिरणारे, अगदी चतुश्रुंगीहून फुरसुंगीला देखिल हेलिकॉप्टरने जाणारे डीएसके आणि त्यांचे कुटुंबिय आजही चैन करत आहेत .

अगदी अलिकडे म्हणजे डिसेंबर २०१६ म्हणजे डीएसकेंचे चिरंजीव शिरिष कुलकर्णी डीएसके मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या खर्चाने पुण्यातील अलिशान ट्रम्प टॉवर्स-  जिथे देशातील सर्वात श्रीमंत लोक रहातात तिथे राहायला गेले!

या ट्रम्प टॉवर मधील फ्लॅटचे भाडे महिना चार लाख रुपये आहे. शिवाय फर्निचर किती कोटींचे केले आहे याची माहिती नाही.

ऐन अडचणीच्या काळात जे डीएसके स्वत:च्या मुलाला छानछोकीपासून परावृत करू शकले  नाहीत त्यांनी आता मराठी माणसाकडे याचना करावी?

डीएसकेंच्या उद्योगांमध्ये काम करणारी कित्येक मराठी कुटूंब, विश्वासाने पेन्शन सकट सर्व पैसे गुंतवणारे सामान्य ठेविदार, वृद्ध व्यक्ती यांचे संसार गेले कित्येक महिने उघड्यावर आले तरी डीएसके आणि त्यांच्या कुटूंबाची विलासी वागणूक थांबली नाही!

सामान्य गुंवणुकदार रस्त्यावर येऊन स्वत:च्या पैशाची भिक मागत होते तेंव्हा डीएसके कुठे होते ?

आजही डीएसके त्यांच्या राजमहालात बसून लोकवर्गणीची विनंती करताहेत आणि एव्हढा मोठा राजवाडा असून देखील त्यांचा मुलगा चार लाख रूपये महिना ट्रंप टॉवर मध्ये राहून भाडं भरतोय!

करोडोंचा राजमहाल विकून, गाड्या विकून, मुलांच काही लाख महिना भाडं थांबवून जिला डीएसके 'तात्पुरती' अडचण म्हणतात ती दूर होईपर्यंत तात्पुरते मध्यमवर्गीय होऊन डीएसके काहीशे कोटी रूपयांच्या ठेवींचे व्याज तरी अगदी सहज देऊ शकत होते, हजारो मराठी कुटूंबाना वाचवू शकत होते.

परंतु त्यांनी तसे केले नाही.

आताच्या आपल्या अवस्थेसाठी डीएसके बाजारातल्या मंदीला जबाबदार ठरवतायत. परंतु किती बांधकाम व्यावसायीक आज असं वागताहेत?

कुटूंबाच्या हट्टापोटी डीएसकेंनी बांधकाम व्यावसायातले पैसे कित्येक इतर डझनभर कधीच न चालणा-या उद्योगात टाकले आणि डीसकेडीएल ही कंपनी अडचणीत आली.

त्या कंपन्यांचे भागीदार म्हणजे डीएसकेंचे कुटुंबिय श्रीमंत झाले. मात्र गुंतवणुकदार अडचणीत आले.

किंगफिशर एयरलाईन्स मल्याच्या अश्याच अव्यवस्थापनामुळे बंद पडली तेव्हा बाजारातल्या मंदीमुळे बाकीच्या एयरलाईन कंपन्या का नाही बंद पडल्या?

डीएसकेंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे अॅसेट्स हे सामान्य ठेविदारांच्या देणींपेक्षा दहा पट जास्त आहेत मग त्यांच्यासारख्या माणसाला त्यांवर ठेविदारांचे पैसे फेडण्यासाठी दहा हजार कोटींवर सहाशे कोटी कर्ज देखील मिळत नाही म्हणजे जगातलं आठवं आश्चर्यच म्हणायला हवं!

खरेतर डीएसकेंकडे ह्यातलं काहीही शिल्लक नाही हे सत्य! त्यांनी हजारो कोटी रूपये फायनान्शियल कंपन्यांकडून आधीच घेतलेत जे ते फेडू शकत नाहीत.

प्रत्यक्षात जागेवर दहा टक्के बांधकाम झालेले नसताना एकूण कामाच्या ऐंशी टक्के पैसे घेऊन झालेत. शिवाय त्यावर बांधकामासाठी कर्ज घेतले आहे तरी डीएसकेंची सर्व कामं दीड वर्षाहून अधिक काळ बंद आहेत.

सहाशे कोटींपेक्षा अधिक ठेवी त्यांनी  मध्यमवर्गीयांकडून गोळा केल्यात ज्यांच व्याज देखिल ते दीड वर्ष देऊ शकलेले  नाहीत.

डीसकेंचे पैसे उभे करण्याचे माहिती असलेले आणि नसलेले सर्व मार्ग कधीच बंद झाले आहेत त्यावरून हेच सिद्ध होतं की दहा हजार कोटी वगैरे गप्पा लोकांची दिशाभूल करण्यासाठी आहेत!

कित्येक वर्ष प्रामाणिकपणे पणे काम करणार-या हजारो कर्मचा-यांचे पगार कित्येक महिने केलेले नाहीत.तरी डीएसके राजवाडयांत राहतात, कोट्यावधींच्या गाड्यांतून फिरतात, कुटूंबाचं विलासी आयुष्य आजही चालूच आहे. आणि आता त्यांना मराठी लोकांकडून 'लोकवर्गणी' हवी आहे . कशासाठी तर हेच चालू ठेवण्यासाठी ?

आजपर्यंत गुंतवणूकदारांचे व्याज त्यांनी थकवलेय, ठेवी परत द्यायला नाकारताहेत्, ज्या ग्राहकांनी डीएसकेंच्या विश्वासावर शेकडो कोटींची गुंतवणूक करून त्यांच्या ( कि कुटुंबियांच्या ?)  प्रकल्पात फ्लॅट घेतले आणि ज्यांची स्वप्न आज दुरावली, त्यांचे पैसे डीएसकेंनी पुर्ण वापरलेत पण प्रकल्प बंद आहेत.

हातावर पोट असलेले हजारो कर्मचारी ज्यांचे कित्येक महिन्यांचे पगार डीएसकेंनी थकवलेत ते सर्व 'मराठी'च आहेत हे डीएसके सोयिस्कररित्या विसरलेत.

आता प्रश्न आहे तो  डीएसकेंकडे पैसे गुंतवलेल्या सामान्य गुंतवणूकदारांचे आणि घर खरेदी करणा-यांचे पुढे काय होणार?.

एक गोष्ट नक्की आहे.

डीएसकेंची सध्याची परिस्थिती पहाता त्यांच्यावर आत्ताच ठेविदारांचे , पुरवठादारांचे पैसे आणि इतर देणी वगळता अधिकृत कर्ज सुमारे १५०० कोटी ( पंधराशे कोटी)  रुपये आहे .एवढं सगळ कर्ज फेडण्याइतके असेट्स त्यांच्याकडे नाहीत.

आणि त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांच्या नावावरील कर्जांचा विचार केला तर हा आकडा ३००० ( तीन हजार)  कोटींच्यावर जातो .

आणि ही देणी फक्त डीएसकेडीएल या कंपनीची आहेत.या कंपनीच्या सर्व मालमत्ता आधीच  बँकाकडे गहाण असल्याने त्यांच्यावर आधी बँक़ांचा हक्क आहे .

त्यातून उरलेच तर इतर गुंतवणूकदारांचा किंवा ठेविदारांचा नंबर लागेल.


आणि रिझर्व बॅंकेची परवानगी न घेता डीएसके आणि त्यांच्या कुटुंबियाच्या ज्या संस्थानी ठेवी घेतल्यात. त्यांच्या ठेविदारांना कोणतीच आशा नाही. त्यांचे पैसे बुडाल्यातच जमा आहेत. 

कारण त्या संस्थांकडे कोणतीच असेट्स नाहीत

अगदी  डीसकेंच्या सगळ्या असेट्स विकल्या तरी वित्तसंस्थांची देणी शिल्लक रहातील आणि त्या देण्यांसाठी वित्त संस्था ’आधी घर,पैसे नंतर’ योजनेत कर्ज घेणा-यांच्या मागे तगादा लावतील.

अशा स्थितीत इतर कोणताही कायदा गुंतवणूकदार किंवा ’आधी घर, पैसे नंतर’ योजनेतील खरेदीदारांच्या मदतीसाठी किंवा त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी उपयोगाचा नाही.

या स्थितीत एकच कायदा सामान्य गुंतवणूकदारांच्या मदतीला येउ शकतो तो म्हणजे ‘ महाराष्ट्र गुंतवणूक हिताचे रक्षण‘ (maharashtra protection of interest of depositors act) कायदा !

या कायद्यान्वये गुंतवणूकदारांचे पैसे कुठेही गेलेले असले तरी त्या त्या ठिकाणावरून ते  वसूल केले जाउ शकतात.

परंतु गरज आहे ती गुंतवणुकदारांनी ठामपणे या कायद्यानुसार कारवाईचा आग्रह धरण्याची!


Subscribe for Free

To receive free emails or free RSS feeds, please, subscribe to Vijay Kumbhar's Exclusive News & Analysis

RTI KATTA is a platform to empower oneself through discussions amongst each other to solve their problems by using Right to Information act, Every Sunday at Chittaranjan Watika, Model Colony,Shivaji nagar, Pune, between 9.30 to 10.30 A.M.

RTI Resource Person, RTI Columnist
Phone – 9923299199

                   http://surajya.org/
Email     – kvijay14@gmail.com


५ टिप्पण्या:

  1. It's easy to investigate such cases when organization is in trouble and then every act looks suspicious, however all investors got returns for 15 years.. So why u didn't stop DSK by doing this analysis.. Every business follows some bad practices or we can say bending of rules but once they come in trouble then we all start treating them as fraud.

    I m not justifying dsk but ur views r also not correct...

    उत्तर द्याहटवा
  2. डी एस के kulkarni साहेबा बद्दल अगदी अचूक आणि खोल पर्यंत ची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद हि माहिती प्रत्त्येक गुंतवणुका पर्यंत पोचविल्यास चांगले सत्कर्म झाले असे समजावे ... सामान्य माणसांची पिळवणूक करणे कधी थांबते देव जाणे .............

    उत्तर द्याहटवा