मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०२५

रोहित आर्या याच्या मृत्यू प्रकरणाला दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण शालेय शिक्षण खाते जबाबदार

रोहित आर्या याच्या मृत्यू प्रकरणाला दीपक केसरकर यांच्यासह संपूर्ण शालेय शिक्षण खाते जबाबदार आहे. दीपक केसरकर यांच्याच कालावधीमध्ये हे संपूर्ण प्रकरण शिजले आणि संपले ही आणि त्याला साथ दिली, त्याला सहकार्य केलं ते त्या खात्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. रोहित आर्याने काही मुलांना ओलीस ठेवलं आणि त्या ओलीस नाट्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. 

हे संपूर्ण प्रकरण काय होतं? त्याची सुरुवात कशी झाली? 




साधारणपणे ऑगस्ट 2022 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये दीपक केसरकर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री होते. अप्सरा मीडिया इंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेने दिलेल्या पत्राच्या आधारे 27 सप्टेंबर 2022 रोजी "प्रोजेक्ट लेट्स  चेंज" अंतर्गत "स्वच्छता मॉनिटर" उपक्रम राबवायला शासनाने मान्यता दिली. राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेची आवश्यकता निर्माण करून परिसरात स्वच्छता टिकून राहावी यासाठी विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी घेण्यास प्रवृत्त करण्याची ही योजना पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणार होती. 

यामध्ये  शालेय शिक्षण मंत्री यांच्या व्हिडिओने स्वच्छतेबाबतचा संदेश विद्यार्थ्यांना दिला जाणार होता. तसेच विद्यार्थ्यांना एक व्हिडिओ दाखवला जाणार होता. या उपक्रमांतर्गत प्रसिद्धी नियोजन व समन्वयासाठी लागणारा वित्त विषयक खर्च, या कार्यक्रमासाठी लागणारा सर्व खर्च कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत जाहिराती आणि प्रायोजकांद्वारे अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्कद्वारे करण्यात येणार होता.

हे पत्र शासनाने राज्याच्या शिक्षण आयुक्तांना पाठवले. या सर्व प्रक्रियेमध्ये कोणीही ज्या संस्थेने हा प्रस्ताव दिलाय त्या संस्थेचं  कायदेशीर अस्तित्व काय आहे? अशा कामासाठी निविदा काढली आहे का? बर या संस्थेचा पत्ताही महाराष्ट्रातील नव्हता या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलं नाही .कारण काहीही करून हा प्रस्ताव मान्य करायचाच हे सर्वांनी मिळून ठरवलं होतं. आश्चर्य म्हणजे त्या संस्थेने हा सर्व खर्च कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत करावयाचा होता तरीही राज्य शासनाने नऊ लाख ९० हजार रुपये त्या संस्थेला दिले. आता ती संस्था हा संपूर्ण खर्च कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून करणार होती तर शासनाने त्यांना पैसे का दिले हा प्रश्न एकाही अधिकाऱ्याच्या मनामध्ये आला नाही. 

हे प्रकरण पचल्यानंतर संबंधित सर्वांना आपण देशाच्या हितासाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत याची जाणीव झाली. त्या अनुषंगाने ' निष्काळजी मुक्त महाराष्ट्र' हे उद्दिष्ट समोर ठेवून स्वच्छता मॉनिटर २०२३ चा पुढील भाग अमलात आणायचे ठरवलं. आधीचा प्रकल्प रोहित आर्या यांच्या  समन्वयाने राबवला असल्याने स्वच्छता मॉनिटर टप्पा-२ हे अभियान राबवण्यासाठी रोहित आर्या यांची प्रकल्प संचालक, प्रोजेक्ट लेट्स चेंज यांची आवश्यक ती मदत व सहकार्य घेण्याचे मान्य करण्यात आले. तशा अर्थाचा शासन आदेश २५ जानेवारी २०२४ रोजी काढण्यात आला.या  प्रकल्पासाठी जवळपास ८० कोटी रुपये आणि त्यातील सुमारे ६६ कोटी रुपये केवळ बक्षीसासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. 

दरम्यान रोहित आर्या याने विजेत्या  शाळांच्या निवडीबाबतच गंभीर प्रश्न उपस्थित  केले आणि या उपक्रमातील मूल्यांकन प्रक्रियेवर आक्षेप घेतले त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, विजेत्या शाळांच्या निवडीत मोठ्या चुका झाल्या,गुणांकन गुप्त ठेवण्यात आलं, चुकीच्या शाळांची निवड करण्यात आली. त्यामुळे मेहनत घेणाऱ्या हजारो शाळा व लाखो शिक्षकांची फसवणूक झाली. चुकीच्या शाळा म्हणजे काय ? रोहित आर्याला नेमकं काय म्हणायचं होतं?

तशा अर्थाचा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आणि मंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांची झोप उडाली. त्यानंतर रोहित आर्याला माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पातून बाहेर काढण्यात आले. परंतु तो थांबला नाही आपलं म्हणणं मांडतच राहिला. त्यामुळे त्याच्यावर विविध आरोप करण्यात आले.त्यामध्ये   शाळांकडून बेकायदा वर्गणी घेण्याच्या आरोपाचाही समावेश होता. परंतु जर सुरुवातीला २७ सप्टेंबर २०२३  च्या पत्रामध्ये रोहित आर्याने किंवा त्याच्या संस्थेने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधून जाहिराती आणि तर प्रयोजकांद्वारे सर्व खर्च करावा असे म्हटले असेल तर मग त्याने वर्गणीच्या माध्यमातून पैसे जमा केले तर ते बिघडलं कुठं ? शासनाचे लोगो लावून अशा प्रकारे वर्गणी जमा करणे  बेकायदा आहे हे खरं असलं तरी  हा सर्व प्रकल्प कायदेशीर असल्याचा आणि त्याला पाठिंबा देणारे व्हिडिओ स्वतः मंत्री दीपक केसरकर, सचिव रणजितसिंग देवल आणि सचिव इम्तियाज काझी यांनी प्रसिद्ध केले. त्याच्यामध्ये या लोगोंचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरची कारवाईची भाषा ही केवळ त्याला धमकी देण्यासाठी होती.कारवाई करणार कोण ? ज्या प्रकरणात त्या खात्याचे मंत्री, सचिव आणि सहा सचिव सहभागी त्या प्रकरणावर कारणार कोण ? त्यानंतर त्याच्यावर कारवाईही झाली नाही. 

मंत्र्यांनी त्याला स्वतःच्या खिशातून सुमारे १५  लाख रुपये दिले.तेही ऑक्टोबर २०२४ मध्ये म्हणजे रोहित आर्याला या प्रकल्पातून बाहेर काढल्यानंतर.  आता हे पैसे कशासाठी दिले? ते कशाने वसूल होणार होते? मंत्री एवढे उदार का झाले? की याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या उद्देशाचा समावेश होता? हा सगळा तपासाचा भाग आहे. शिवाय मंत्र्यांनी जे पैसे दिले ते अमेन एलएलपी या संस्थेला दिले आहेत. ही एक लिमिटेड लायबिलिटी फॉर्म असून तिचा नोंदणी पत्ताही गुजरातचाच आहे. आता पुण्यात राहणाऱ्या माणसाच्या दोन्ही संस्थांची कार्यालय गुजरात मध्ये का होती ?

थोडक्यात म्हणजे जोपर्यंत रोहित आर्या सर्वांना सहकार्य करत होता सर्वांच्या बरोबरीने होता तेव्हा सर्वांना त्याची कोणती अडचण नव्हती.त्याच्यासाठी बेकायदा गोष्टी करायलाही मंत्र्यापासून सर्वाधिकार्‍यांपर्यंत तयार होते. परंतु जसा त्याने प्रकल्पातील शाळांच्या आणि बक्षीसपात्र लोकांच्या निवडीबद्दल शंका व्यक्त करायला सुरुवात केली तसे त्याच्यावर आरोप केले गेले. आणि हीच बाब या संपूर्ण प्रकरणांमध्ये काहीतरी काळेबेरे होते अशी शंका घ्यायला पुरेशी जागा आहे.

ओलीस नाट्यापूर्वी  जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित आर्या स्पष्टपणे मांडताना दिसत आहे की पैसा हा मुद्दा नाही.परंतु मला यंत्रणेला काही प्रश्न विचारायचे आहेत त्या तो पुढे असेही म्हणतो प्रोजेक्ट चेंज हा मी जिवंत राहिलो तर पुढे चालेल आणि यशस्वी होईल आणि नाही राहिलो तर ही मुलं तो प्रकल्प पुढे चालू ठेवतील. याचाच अर्थ त्याचा त्या मुलांना मारण्याचा कोणताही विचार नव्हता असं दिसतं. त्यातच ओलीस नाट्याच्या दरम्यान पोलिसांनी दीपक केसरकर यांना रोहित आर्याशी बोलण्याची विनंती केली होती परंतु दीपक केसरकर यांनी ती फेटाळली. त्यांनी ती का फेटाळली? कदाचित त्यांच्यावर कायद्याने ती जबाबदारी नसेल ही परंतु काही लहान मुलांचा त्या ओलिसांमध्ये समावेश होता. 

दीपक केसरकर रोहित आर्याला चांगलं ओळखत होते.त्याला त्यांनी पैसेही दिले होते त्याचे कौतुकही केलं होतं. असं असताना त्यांनी त्याच्याशी बोलायला नकार का दिला. कदाचित रोहित आर्याने केसरकारांना काही प्रश्न सार्वजनिक रित्या विचारले असते तर त्याची त्यांना उत्तर देता आली नसती आणि बिंग बाहेर पडलं असतं.  त्यामुळेच केसरकारांनी नकार दिला. असं म्हणता येईल की एकूणच हे  प्रकरण सोपं नाही त्याला अनेक कंगोरे आहेत. याच्यातला भ्रष्टाचाराचा, शासकीय पैशाच्या अपव्ययाचा, त्यासाठी केलेल्या कटकारस्थानाचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. परंतु आता खरा मुद्दा आहे तो केसरकर आणि मंडळींची खरचं चौकशी होऊन प्रकरण मार्गी लागणार की त्यांनाही आता क्लीन चिट मिळणार ? 

Vijay Kumbhar

RTI Resource Person, RTI Columnist

Phone – 9923299199

Website –  https://surajya.org/

Blogs      - https://vijaykumbhar-marathi.blogspot.com/

                  https://vijaykumbhar.blogspot.com/

Email    –    kvijay14@gmail.com

Facebook -https://www.facebook.com/kvijay14

Twitter    - https://twitter.com/Vijaykumbhar62

YouTube - https://www.youtube.com/vijaykumbhar

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

पंधरा वर्षानंतरही माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टींच्या हत्येच्या आरोपींचा तपास नाही, संतोष देशमुख प्रकरणाचे काय होणार?

मागील सुमारे दीड महिना मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण गाजत आहे. तशी महाराष्ट्रामध्ये छोटी मोठी दहशतीचे केंद्र अनेक आहेत. परंतु मस्साजोग प्रकरणाने सर्वांवर कहर केला, राज्याची अब्रू धुळीला मिळवली. या प्रकरणातील क्रोर्य अंगावर शहारे आणणारे होतं. परंतु राज्यात किंवा देशात घडलेलं दहशतीचं हे पहिले प्रकरण नाही. पंधरा वर्षांपूर्वी सतीश शेट्टी या माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या झाली. त्यानंतर राज्यात आणि देशात अशा अनेक हत्या झाल्या. परंतु त्यांच्या हत्येचा तपास मात्र अपवादानेच लागला. 

Santosh Deshmukh

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज पंधरा वर्षे पूर्ण झाली.परंतु हत्येचा तपास मात्र पूर्ण झालेला नाही. या प्रकरणात इतका काही चढ-उतार झाला की आरोपींचा तपास लागणे दूर राहिले सतीश शेट्टी नावाची व्यक्ती अस्तित्वात होती की नाही याची शंका यावी अशी परिस्थिती निर्माण झाली. शेट्टी यांची हत्या झाली त्यावेळीही महाराष्ट्रामध्ये फार मोठा गदारोळ झाला होता. सर्व स्तरावरून या हत्येचा निषेध केला जात होता. मोर्चे निघाले,आंदोलने झाली परंतु प्रत्यक्षात मात्र काही घडले नाही. या हत्येचा तपास अधांतरीच राहिला. सुरुवातीच्या काळात आक्रमक असणारे राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांचा सहभाग हळूहळू कमी झाला. आता सतीश शेट्टीचे बंधू संदीप शेट्टीएकाकी ही लढाई लढत आहेत.


असं का होतं? सतीश शेट्टी, संतोष देशमुख किंवा इतरही  अनेक कार्यकर्ते असतील त्यांच्या हत्येच्या तपासामध्ये दिरंगाई का होते? आरोपी सापडत का नाहीत?  आरोपींना वेगवेगळ्या सवलती का दिल्या जातात? अगदी सर्व राजकीय पक्ष,  सामाजिक कार्यकर्ते व जनमत विरोधात असतानाही  तपासामध्ये यंत्रणा दिरंगाई का करतात?. याचे कारण एकच. अशा हत्यांशी संबंधित असलेल्या आरोपींचे आणि त्यांच्या आकांचे असलेले सर्वपक्षीय सलोख्याचे संबंध. अर्थात अशा सलोख्याच्या संबंधांमध्ये मोठा हिस्सा हा आर्थिक,जातीय लागेबांध्यांचा किंवा मतांच्या राजकारणाचा असतो याच्यात मात्र कोणतीही शंका नाही.

Satish Shetty

सतीश शेट्टी आणि संतोष देशमुख प्रकरणातील साम्य म्हणजे ही दोन्ही प्रकरणे भ्रष्टाचाराविरोधी लढ्याशी संबधित आहेत आणि दोन्ही प्रकरणे कार्यकर्त्यांची सुरक्षा, न्यायव्यवस्था आणि यंत्रणांतील सडलेल्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतात. दोन्ही व्यक्ती आपल्या ठिकाणी समाजाच्या हितासाठी आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कृत्यांविरोधात उभ्या राहिल्या होत्या. परंतु त्यांना न्याय मिळण्यात होणारा विलंब आणि अपारदर्शकतेमुळे ही प्रकरणे वादग्रस्त ठरली आहेत. 

सतीश शेट्टी यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक जमीन घोटाळ्यांचा पर्दाफाश केला होता. विशेषत: त्यांनी भूसंपादनातील गैरव्यवहार , अनियमितता, आणि भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर केला होता. त्यांच्या कामामुळे शक्तिशाली लोकांचा आर्थिक स्वार्थ धोक्यात आला, ज्यामुळे त्यांना सातत्याने धमक्या येत होत्या.१३ जानेवारी २०१० रोजी मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांची  हत्या करण्यात आली.

संतोष देशमुख हेही एक सामान्य नागरिक होते-  सरपंच होते, त्यांनीही भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी आपला आवाज बुलंद केला.देशमुख हे महाराष्ट्रातील एका खाजगी विकास प्रकल्पातील गैरव्यवहाराच्या विरोधात लढा देत होते. संतोष यांनी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप लावले., ज्यामुळे राजकीय आणि आर्थिक शक्ती असलेले लोक त्यांच्या मागे लागले. धोका असल्याची वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यानंतर त्यांची हत्या झाली. सतीश आणि संतोष दोघांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचे सतत सांगितले होते. परंतु सरकार आणि यंत्रणा त्यांना योग्य संरक्षण देण्यात अपयशी ठरल्या. 

हे सगळं आपोआप घडलं असेल का? अजिबात नाही. आपल्या कार्यक्षेत्रात गैरप्रकार घडत आहेत हे संबंधित राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि प्रशासन या सगळ्यांना माहिती असतं. किंबहुना या सर्वांचा त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे असे प्रकार घडत असतात आणि त्यांच्यावर पांघरूणही घातलं जातं आणि तसं पांघरूण घातलं जावं, आपले गैरव्यवहार सुरळीतपणे चालावेत यासाठीच सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे नेते यांना आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये आपल्या मर्जीतले अधिकारी हवे असतात आणि त्यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.त्यामुळे किमान महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या “मर्जीतले” अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नियम डावलूनवर्षानुवर्षे काम करताना दिसतात. 

हे सगळं एकमेकांशी लागेबांधे असल्यामुळेच घडतं. त्यामुळे त्या क्षेत्रातले गैरप्रकार उघडकीस आणण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला थांबवण्यासाठी, अडवण्यासाठी,  त्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी किंवा त्याला संपवण्यासाठी हे सगळे जण एकत्र येतात आणि त्यातूनच सतीश शेट्टी किंवा संतोष देशमुख अशी प्रकरण घडतात. असे प्रकार घडल्यानंतर काही काळ सर्व राजकीय पक्ष एकत्र आल्याचा आभास निर्माण करतात परंतु सरते शेवटी काहीही होत नाही.उलट ज्या व्यक्तीने भ्रष्टाचार उघड केला, गैरव्यवहार उघडकीस आणला ती व्यक्ती एकेकाळी अस्तित्वात होती की नव्हती अशी परिस्थिती निर्माण केली जाते. संतोष देशमुख प्रकरणांमध्ये तरी तसं काही घडू नये एवढीच अपेक्षा